[ad_1]
राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिवसेनेतील बंडखोर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकरांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देताना शिवसेनेच्या फुटीचा आणि छगन भुजबळ व नारायण राणेंच्या बंडखोरीचा इतिहासच मांडला आहे. तसेच छगन भुजबळ व नारायण राणे यांनी शिवसेना का सोडली यावर भाष्य केलं. ते गुरुवारी (१४ जुलै) पुण्यात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देत होते.
अजित पवार म्हणाले, “माझ्या माहितीप्रमाणे १९९२ ला पहिल्यांदा शिवसेना फुटली तेव्हा शरद पवार महाराष्ट्रात नव्हते. ते केंद्रात संरक्षण मंत्री होते. तेव्हा सुधाकर नाईक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. आपण सर्वांनी हे लक्षात घेतलं पाहिजे. तेव्हा शिवसेना मंडल आयोगाच्या निमित्ताने फुटली. शिवसेनेने मंडल आयोगाच्या अंमलबजावणीबाबत वेगळी भूमिका घेतली. ती भूमिका छगन भुजबळ व इतर १८ सहकाऱ्यांना पटली नाही. म्हणून ते बाहेर पडले. दुसऱ्याच्या नावावर पावती फाडण्याचं कारण नाही.”
“…म्हणून नारायण राणेंनी शिवसेना सोडली”
“नारायण राणे बाहेर पडले तेव्हाही अशीच गोष्ट घडली. उभ्या महाराष्ट्राने पाहिलं की नारायण राणे व शिवसेनेतील नेतृत्वाचं जमत नव्हतं, खटके उडत होते. हिंदुह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत होते. परंतू त्याने नारायण राणे यांचं समाधान झालं नाही. म्हणून त्यांनी टोकाची भूमिका घेत शिवसेना सोडली. त्यात दुसऱ्यांनी फोडाफोड करण्याचं काहीच कारण नाही. तेव्हाही शरद पवार महाराष्ट्रात नव्हते. ते केंद्रात कृषीमंत्री होते. नीट आठवा. तेव्हा नारायण राणे बाहेर पडले आणि काँग्रेसमध्ये गेले,” असं अजित पवार यांनी सांगितलं.
“उचलली जीभ लावली टाळ्याला असं करू नये”
अजित पवार म्हणाले, “दीपक केसरकर १९९२ मध्ये फार ज्युनियर होते. त्यावेळी ते आमच्याच पक्षात होते. आता केसरकर शिंदे गटाचे प्रवक्ते झाले आहेत. त्यांनी अशाप्रकारची वक्तव्यं करताना फार विचारपूर्वक, अभ्यासपूर्वक केली पाहिजेत. प्रवक्त म्हणून उचलली जीभ लावली टाळ्याला असं करू नये. बारकाईने माहिती घ्यावी.”
हेही वाचा : “…तर पुढे काय होणार हे महाराष्ट्राने पाहावं,” पत्रकार परिषदेतील ‘त्या’ घटनेनंतर अजित पवार यांची शिंदे-फडणवीसांवर टीका
“केसरकरांना आम्हीच तिकीट देऊन आमदार केलं होतं”
“हा धादांत खोटा आरोप आहे. दीपक केसरकर यांना आम्हीच तिकीट देऊन आमदार केलं होतं. ते आमचे एकेकाळचे सहकारी आहेत. त्यांनी असं काहीही बोलू नये. त्यांनी माहिती घेऊन बोलावं असा माझा त्यांना प्रेमाचा सल्ला आहे,” असं म्हणत अजित पवारांनी केसरकरांना टोला लगावला.
[ad_2]