जळगाव : जिल्ह्यातील रावेर व यावल तालुक्यातील आठ अवैध सावकारांनी पंधरा शेतकऱ्यांना वेळोवेळी प्रतिमहिना ३ टक्के व त्यापेक्षा अधिक व्याजाने पैसे दिले. त्याची परतफेड करू न शकल्याने तब्बल ३८ हे. ३७.५८८ आर जमीन दस्त नोंदवून बळकावली होती. शेतकऱ्यांनी बारा वर्षांहून अधिक काळ लढा देत तब्बल ४७ सुनावण्यांनंतर जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवई यांनी पंधरा शेतकऱ्यांना ती जमीन परत करण्याचे बुधवारी आदेश दिले. एका प्रकरणात रावेर येथील २७ प्लॉटवर वसाहत उभी राहिल्याने मूल्यांकन करून पावणेदोन कोटी रुपये संबंधिताला देण्याचे आदेश सावकाराला देण्यात आले आहेत. त्यानंतरही शेतकरी सावकारांविरुद्ध पोलिसांत तक्रार देऊन गुन्हे दाखल करण्याची प्रक्रियाही करू शकणार आहेत. दरम्यान, या प्रकरणानंतर राज्यातील अशा प्रकरणातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. रावेर तालुक्यातील सावदा येथील नंदकुमार मुकुंदा पाटील याच्यासह आठ अवैध सावकारांनी कर्जाच्या व्याजापोटी दस्त नोंदवून बळकावलेली तब्बल ३८ हे. ३७.५८८ आर शेती रावेर व यावल तालुक्यांतील पंधरा शेतकऱ्यांना परत करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवई यांनी दिले आहेत. त्याचप्रमाणे रावेर येथील २८ प्लॉटवर घरे बांधण्यात आल्याने त्याचे मूल्यांकन करून तब्बल पावणेदोन कोटी रुपयेही सावकाराला परत द्यावे लागणार आहेत.
अवैध सावकारांवर महाराष्ट्रातील ही सर्वात मोठी कारवाई आहे. महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ चे कलम १८ (२) आणि कलम १७ (५) नुसार ही कारवाई करण्यात आली आहे. सावकारांच्या ताब्यात असलेली पंधरा शेतकऱ्यांची शेती सातबारा उताऱ्यावर त्यांच्या नावे लावण्याबाबत डीडीआर जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देणार आहेत. या निकालाच्या तब्बल ३२ हजार प्रति काढण्यात आल्या. नंदकुमार मुकुंदा पाटील, मुरलीधर सुदाम राणे, मुरलीधर तोताराम भोळे, मुरलीधर काशीनाथ राणे, मधुकर तुकाराम राणे, सुदाम तुकाराम राणे, श्रीधर गोपाळ पाटील, मधुकर वामन चौधरी या आठ सावकारांविरुद्ध अवैध सावकारीबाबत शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या होत्या. त्यावर ३ जानेवारी २०१९ पासून जिल्हा उपनिबंधकांकडे सुनावणीला सुरुवात झाली. दरम्यान, १७ ऑगस्ट २०२१ रोजी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या पथकांनी सावदा, रावेर, यावल येथील अवैध सावकारांवर धाडी टाकल्या होत्या. छापेमारीमध्ये पथकांना २३ खरेदीखत, सौदा पावत्यांसह साठेखत सापडले होते. सावकारांनी नोंदवले दोनशेवर दस्त नंदकुमार पाटील हा मुख्य सावकार असून इतर सात जण त्याचे साथीदार आहेत. त्यांनी शेतकऱ्यांना पैसे देताना खरेदीखत करून घेतले आहे. पैशांची परतफेड करू न शकलेल्या शेतकऱ्यांच्या शेतीचे नातेवाइकांच्या नावावर व्यवहार करण्यात आले आहेत. नंदकुमार पाटील ४७, मुरलीधर राणे ६५, मुरलीधर भोळे ३७, मुरलीधर काशीनाथ राणे ६६, मधुकर तुकाराम राणे २१, सुदाम तुकाराम राणे २१, श्रीधर गोपाळ पाटील १८ व मधुकर वामन चौधरी याने ९ दस्त नोंदवले आहेत. व्यवहाराची ३२४ कागदपत्रे सुनावणीदरम्यान सादर करण्यात आली. आठ शेतकऱ्यांचा मृत्यू झालेला आहे. गरज असेल तेव्हा शेतकऱ्यांना पैसे देऊन दस्त नोंदवायचे… अवैध सावकार गरजू शेतकऱ्यांना वेळोवेळी पैसे देत होते. पैसे देण्यापूर्वीच त्यांच्या शेतीचे खरेदीखत करून घेत होते. सर्व व्यवहार रोखीने झाले आहेत. एकही व्यवहार ऑनलाइन झालेला नाही. सन २००२-२००३ या वर्षी करण्यात आलेले बाँड आजही कायम आहेत. महिन्याला ३ टक्के व्याजदराने पैसे देण्यात आले आहेत. शेतीचे नोंदणीकृत व्यवहार झालेले आहेत.