मुंबई – मुंबई मेट्रो ३ कारशेडवरून ठाकरे सरकारला झटका बसला आहे. मुंबई उच्च न्यायालयानं कांजूरमार्ग येथे केलं जाणार काम थांबवण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाच्या या आदेशानंतर भाजपानं ठाकरे सरकारला घेरलं आहे. उद्धव ठाकरे यांनी जनतेची माफी मागावी तसेच आदित्य ठाकरे यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी भाजपाकडून करण्यात आली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने कामाला स्थगिती दिल्यानंतर भाजपाचे नेते किरीट सोमैय्या यांनी ट्विट करत पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. “ठाकरे सरकारला मेट्रो कारशेड जागा अधिग्रहणाचा आदेश मागे घ्यावा लागला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जनतेची माफी मागायला हवी. ज्यांच्यामुळे अतिरिक्त खर्च वाढवणार आहे. त्याचबरोबर उशिरही होणार आहे. पालकमंत्री आदित्य ठाकरेंनीही राजीनामा दिला पाहिजे,” अशी मागणी किरीट सोमैय्या यांनी केली आहे.
Metro Kanjur Car Shed Thackeray Sarkar to withdraw aquisition order. CM Uddhav Thackeray must apologise. Who will bear the delay/additional cost. Guardian Mantri Thackeray should resign @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis @mipravindarekar @ChDadaPatil
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) December 16, 2020
दरम्यान, आरेमध्ये मेट्रो कारशेड होऊ नये यासाठी पुढाकार घेणारे राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी न्यायालयाच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे. मेट्रो मार्गासाठी ही जमीन महत्वाची असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
पुढील वाटचाल ठरवण्यासाठी आम्ही कोर्टाच्या आदेशाची लिखित सविस्तर आदेशाची वाट पाहत आहोत. मेट्रो ३ सोबतच ६, ४ आणि १४ साठी ही जमीन महत्वाची आहे. यामुळे सरकारचे पाच हजार ५०० कोटी रुपये वाचत आहेत. १ कोटी लोकांना याचा फायदा होणार आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.