बारामती : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिल्यानंतर राज्य सरकारवर विरोधी पक्षाकडून जोरदार टीका केली जात आहे. राज्यातील विविध क्षेत्रातील पदांची भरती देखील आरक्षणाचा निकाल येईपर्यंत पुढे ढकलण्याची मागणी केली जात आहे. आता महाविकास आघाडी सरकारच्या दुर्लक्षामुळे आरक्षण रेंगाळले, अशी टीका भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे.
बारामतीत एका कार्यक्रमात बोलताना हर्षवर्धन पाटील म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांच्या काळात देण्यात आलेल्या मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत सध्याच्या सरकारने योग्य ती कायदेशीर व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण केली नाही. सरकारच्या दुर्लक्षामुळेच, हलगर्जीमुळेच मराठा, धनगर आणि इतर समाजांचं आरक्षण रेंगाळले आहे.
नव्याने सर्वोच्च न्यायालयात जाण्याबाबत तात्काळ निर्णय घ्यावा आणि विद्यार्थ्यांचं नुकसान टाळावे, अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली.