मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात १५ मिनिटे बंद दाराआड चर्चा झाली. या भेटीमुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चेला उधाण आले होते. तसेच या भेटीवर सेनेचे कट्टर विरोधक नारायण राणे यांनी सुद्धा भाष्य केले होते. मात्र आता या भेटीबाबत खुद्द देवेंद्र फडणवीस यांनीच माहिती दिली आहे. बैठक ओबीसी आरक्षणाबाबत होती आणि ओबीसी आरक्षणासंदर्भातच चर्चा झाल्याचं फडणवीसांनी सांगितलं आहे.
ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर आज सह्याद्री अतिथीगृहावर सर्व पक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या सर्व पक्षीय बैठकीनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात बंद दाराआड १० मिनिटं चर्चा झाली. सर्वपक्षीय बैठकीनंतर फडणवीस यांनी ओबीसी आरक्षणाविषयी भाजपची भूमिका स्पष्ट केली.
फडणवीस म्हणाले की, ओबीसींच्या जनगणनेची आवश्यकता नाही हे मी आजच्या बैठकीत स्पष्ट केलं आहे. इम्पिरिकल डेटा म्हणजे काय हे सुद्धा मी सरकारला सांगितलं आहे. त्यानुसार सरकारने कार्यवाही केली तर ओबीसींचं आरक्षण आणू शकतो, असं फडणवीसांनी सांगितलं आहे. जोपर्यंत ओबीसी आरक्षण मिळत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुका घेऊ नका. नाही तर ओबीसींची अपरिमित हानी होईल. या संदर्भात पुढच्या शुक्रवारी अंतिम निर्णय घेऊ असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.