सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे

Posted in News on Mar 5, 2014

नवी मुंबईच्या नियोजित विकासासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे

पालकमंत्री ना. गणेश नाईक यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

नवी मुंबईचा सिंगापूरच्या धर्तीवर नियोजित विकास करण्यासाठी एमएमआरडीए, सिडको, नवी मुंबई महानगरपालिका, एमआयडीसी आदी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे असे निर्देश ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गणेश नाईक यांनी दिले.

नवी मुंबईच्या विविध प्रश्नांसंबंधी विधान भवनातील ना. गणेश नाईक यांच्या दालनात बैठक काल आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. एमएमआरडीए, सिडको, नवी मुंबई महानगरपालिका, एमआयडीसी, एमएसआयडीसी तसेच पोलिस अधिकारी यावेळी उपस्थित होते. नवी मुंबईतील गावठाणांचा महानगर पालिकेमार्फत समूह विकासाच्या माध्यमातून पुनर्विकास करणे, सिडकोकडील अर्बन हट एक्झिबिशन सेंटर नवी मुंबई महानगरपालिकेकडे हस्तांतरित करणे, घणसोली रस्त्याचा, खारघर रस्त्याच्या धर्तीवर विकास करणे, जाहिरात धोरण आदी विषयावर या बैठकीत चर्चा करण्यात आली.

नवी मुंबई महापालिका क्षेत्रात ट्रक-टेम्पो टर्मिनस, शाळा, पोलिस चौकी, रुग्णालये, उद्याने आदी सुविधांची निर्मिती करण्यासाठी सिडको आणि एमआयडीसीने अविकसित भूखंड तातडीने महानगरपालिकेकडे हस्तांतरित करावे, वाहतूक कोंडीच्या वाढत्या समस्येचे निराकरण करण्यासाठी एमएमआरडीएने पाम बीच रोड व ठाणे बेलापूर रस्त्यावरील पुलांची कामे त्वरित हाती घ्यावी, महापालिकेने रेल्वे स्टेशनच्या चारी बाजूने कॅमेरे लावून फेरीवाल्यांना कठोरपणे प्रतिबंध करून रेल्वे स्टेशनचा परिसर स्वच्छ व मोकळा करावा, अशा सूचनाही ना. गणेश नाईक यांनी या बैठकीत दिल्या.

Visit Us On FacebookVisit Us On TwitterVisit Us On Youtube